| पनवेल | प्रतिनिधी |
एप्रिल अखेरीस पोहोचत असताना पनवेल तालुक्यात पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, सध्या काही गावे व वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन योजनाअंतर्गत काही ठिकाणी कामे वेळेत पूर्ण झाली असली, तर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात टळली असती. मात्र, तालुक्यात थोड्याच ठिकाणीच्या योजना पूर्ण झाल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे. यामुळे प्रशासनाने 2025-26 साठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार 18 गावे आणि 33 वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आदिवासी व दुर्गम भागांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. काही दिवसांपासून आपटा हद्दीतील माडभुवन, पाले बुद्रुकमधील कोळवाडी, वारदोलीतील ताराटेप वाडी, तसेच वांगणी तर्फे वाजे हद्दीतील मोहोचा पाडा आणि मोहो येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मेमध्ये पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने भूजल पातळी झपाट्याने खाली गेली आहे. परिणामी अनेक भागांतील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या असून, नागरिकांना पर्यायी पाणीस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे.







