प्लॉटिंग आणि विकासकामांच्या नावाखाली निसर्गाची मोठी हानी
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटनाचे नंदनवन आणि निसर्गसंपन्न तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. खंडास ग्रामपंचायत हद्दीतील आंभेरपाडा परिसरात प्लॉटिंग आणि विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर साग, खैर यांसारख्या मौल्यवान वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंभेरपाडा परिसरात सध्या विविध विकास प्रकल्प आणि प्लॉटिंगची कामे सुरू आहेत. या कामांसाठी डोंगर उतार आणि जंगल क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली असून, काही ठिकाणी डोंगराचा नैसर्गिक भूभागही सपाट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय समतोलावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तोडण्यात आलेल्या झाडांचे लाकूड विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आले आहे. वृक्षतोडीदरम्यान जंगलातील लहान वनस्पती, वनौषधी तसेच स्थानिक आदिवासींसाठी उत्पन्नाचे साधन ठरणाऱ्या करवंदाच्या जाळ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, या भागातील जैवविविधता आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर विपरीत परिणाम होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
विकासकामांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्याचा दावा संबंधितांकडून केला जात असला, तरी परवानगीच्या मर्यादेपलीकडे वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. काही नागरिकांच्या मते, मर्यादित वृक्षतोडीची परवानगी घेऊन प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर जंगल साफ केले जात आहे. दरम्यान, वाढत्या जंगलतोडीचा परिणाम कर्जतच्या स्थानिक हवामानावरही जाणवू लागल्याची चर्चा आहे. पूर्वी तुलनेने थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात तापमानात वाढ होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वन विभाग आणि प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थितीची तपासणी करावी तसेच नियमबाह्य वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
वन विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
कर्जत तालुक्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोड आणि जमीन सपाटीकरणाच्या कामांबाबत वन विभागाची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिकांच्या मते, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असतानाही त्यावर प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. परिणामी, नियमबाह्य वृक्षतोड आणि जमीन विकासकामांना चालना मिळत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने अधिक पारदर्शकपणे कामकाज करून सुरू असलेल्या कामांची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







