। चिरनेर । प्रतिनिधी ।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या आवारात शुक्रवारी (दि.5) वृक्षारोपण करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात न्हावा शेवा वाहतूक शाखेतील 08 पोलीस अंमलदार आणि 04 वाहतूक वार्डन यांनी सहभाग घेतला.
यावेळी शाखेच्या आवारात आंबा, वड, पिंपळ, कडुनिंब यांसारख्या देशी व पर्यावरणपूरक झाडांची रोपे लावण्यात आली. हातात रोपे घेऊन उभ्या असलेल्या पोलीस बांधवांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
दररोज हजारो गाड्यांचा धूर, ध्वनी प्रदूषण यांचा सामना करतो. सामाजिक बांधिलकी म्हणन झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती जगवणेही महत्त्वाचे असल्याने, लावलेल्या प्रत्येक रोपाची जबाबदारी संबंधित अंमलदारांनी घेतली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी सांगितले. दरम्यान दररोज गाड्यांना सिग्नल देणारे वाहतूक पोलिसांच्या हात आज निसर्ग संवर्धनासाठी सरसावले आणि वाहतूक नियमांसोबत पर्यावरण रक्षण हा संदेश कृतीतून दिला.







