। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल आता जीवघेणी ठरत असल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून 22 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. पावसाचं पाणी आत येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला. या वादात आरोपीने एका तरूणावर चाकू हल्ला केला. अंधेरी ते बोरिवली जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. मयंक लोहार असे मृत तरूणाचे नाव आहे. मयंक हा विरारचा रहिवासी होता. या हत्येनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथके तयार केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरूणाच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता. हा वाद इतक्या विकोपाला गेला की धावत्या लोकलमध्ये चाकू भोसकून मयंक लोहार या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.23) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोगेश्वरी ते मालाड या स्टेशनदरम्यान ही घटना घडली. या संपूर्ण प्रकाराने रेल्वेतील इतर प्रवासी भयभीत झाले.
एवढ्या गर्दीत एका प्रवाशाची चाकू भोसकून हत्या केली जाते यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर या घटनेतील हल्लेखोराचा अद्याप पत्ता लागला नाही. या आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे. हत्येनंतर आरोपी रेल्वेतून पसार झालेला आहे. दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. रक्ताच्या थारोळ्यात हा तरूण डब्यात कोसळला होता. डब्यात प्रवाशांची गर्दी होती. चाकू असणाऱ्या आरोपीला पाहून इतर प्रवासीही घाबरले. अद्याप हा आरोपी सापडला नाही. रेल्वेतील आणि स्टेशनवरील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ६ पथके नेमण्यात आली आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.







