निवडून आल्यावर लोकप्रतिनिधींची पाठ, दगडांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ
| सुधागड-पाली | गौसखान पठाण |
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 79 वर्षे झाली. तरी देखील सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी-नागशेत हे गाव मात्र आजही एका मूलभूत प्रश्नाशी झुंज देत आहे. येथे स्मशानभूमीच नसल्याने मृत व्यक्तींवर दगड रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात गावोगावी विकासाच्या घोषणा, आश्वासनांचा वर्षाव आणि जनतेच्या दारात येणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र गावाचा रस्ता विसरतात, अशी संतप्त प्रतिक्रीया ग्रामस्थांमधून उमटत आहेत.
देश स्वतंत्र होऊन आज तब्बल 79 वर्षे उलटली. तरी देखील काही ग्रामीण भागांत मूलभूत सुविधांची वानवा आहे. सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी-नागशेत हे गाव मात्र आजही एका मूलभूत प्रश्नाशी झुंज देत आहे. येथे स्मशानभूमीच नसल्याने मृत व्यक्तींवर दगड रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. त्यामुळे जिवंत माणसाला घर नसेल तर सरकार योजना दाखवते; परंतु, मेल्यानंतर दोन हात जागाही मिळू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? निवडणुकीच्या काळात गावोगावी विकासाच्या घोषणा, आश्वासनांचा वर्षाव आणि जनतेच्या दारात येणारे लोकप्रतिनिधी, निवडून आल्यानंतर मात्र या गावाचा रस्ता विसरतात, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. काम संपले की आश्वासनही संपते, अशी उपरोधिक प्रतिक्रिया देखील नागरिक देत आहेत.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकवेळा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. संबंधित विभाग, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न आजतागायत प्रलंबित आहे. परिणामी मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी दगडांची रचना करून तात्पुरती व्यवस्था करावी लागते. हे दृश्य केवळ प्रशासनाच्या उदासीनतेचे नव्हे, तर विकासाच्या दाव्यांवरील प्रश्नचिन्ह आहे. आज देश अमृतकाळाच्या घोषणा करीत आहे; मात्र, सुधागडच्या या वाडीतील नागरिक विचारत आहेत, आमच्या गावात माणसाला सन्मानाने जगण्याचा आणि मरण्याचाही अधिकार कधी मिळणार? जनतेला आश्वासनांचे पेढे वाटणे सोपे असते; परंतु, प्रत्यक्ष काम करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. आज कोंडी धनगरवाडी-नागशेतची परिस्थिती पाहिली तर ही ओळ अक्षरशः खरी वाटते. विकासाच्या भाषणांनी स्मशानभूमी उभी राहत नाही; त्यासाठी निर्णय, निधी आणि संवेदनशीलता लागते. दरम्यान, स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.







