। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून, सह्याद्री साहित्य मंडळ अलिबाग व समाज क्रांती आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण व काव्य संमेलनाचे आयोजन रविवार 24 एप्रिल रोजी विद्यानगरीच्या रविराजनगरात प्रा.महेश बिर्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या वेळी प्रा.बिर्हाडे म्हणाले, माणसाला आनंदी जीवन जगायचे असेल तर, हेवेदावे विसरून सत्कर्म करायला पाहिजे. बाबासाहेबांच्या मार्गाने जाऊन पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाटील होते, ते म्हणजे मानवी जीवन हे एखाद्या कवितेसारखे सुखदुःखाने भरलेले असते. तरीही पुरस्कार देऊन माणसे, माणसांना सन्मानित करतातच.आनंदवर्धनाचे कार्य करतात. हे ही नसे थोडके! चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती पाटील या देखील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, माझ्या चेंढरे परिसरात असे सुंदर सोहळे साजरे होतात. याचा मला अभिमान वाटतो.
समाजक्रांती आघाडीचे प्रवक्ते सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले. तर कार्यक्रम प्रमुख रवींद्र थळकर व सह्याद्री साहित्य मंडळाचे सचिव कल्पेश शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉक्टर अनिल बांगर, दिलीप मोकल, रवींद्र थळकर, वैशाली पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण कार्य केल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. समारंभाचे मुख्य आकर्षण पुरस्कार वितरण ठरले. बाळकृष्ण गणपत पाटील, विद्यानगर व दत्तात्रेय लक्ष्मण माळवी, लोणारे या दोघांना अलिबाग मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कैलास पिंगळे लिखित अंबातीर कादंबरीला डॉक्टर म.सु.पाटील वाङ्मय पुरस्कार व जीविता पाटील लिखित भास आभास या चारोळी काव्यसंग्रहाला प्रा.गंगाधर पाटील वाङ्मय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. संपन्न झालेल्या काव्यसंमेलनात मोहन पाटील, प्रल्हाद घेवदे, दिलीप मोकल, कल्पेश शहा, वैशाली पाटील, जीविता पाटील, विनोद टेंबुलकर, सविता पाटील, नथुराम कुथे, शरदचंद्र पाटील, बी.जी.पाटील, कैलास पिंगळे, महेश बिर्हाडे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन जीविता पाटील, व वैशाली पाटील यांनी केले. सह्याद्री साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष विनोद टेंबुलकर यांनी आभार प्रदर्शन केले.