। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसनेला मोठी खिंडार पाडत तब्बल 40 च्या आसपास आमदार नेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान 40 आमदार शिवसेनेचे असतील तर एकनाथ शिंदेंना भाजपसोबत सत्ता स्थापनेचा मोठी संधी आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आपला हक्क दाखवू शकतात का यावर बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान त्यांनी विधिमंडळ गटनेता, पक्ष प्रतोद आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार हवे असलेले दोनतृतीयांश संख्याबळ या तांत्रिक मुद्द्यावर पूर्ण केले तर शिंदे गटाची बाजू कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. धनुष्यबाण हे चिन्ह राहिले पाहिजे यासाठी भाजपची कायदे मंडळी कामाला लागल्याचे बोलले जात आहे.
मागच्या दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठले त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 11 आमदार असल्याची चर्चा होती. यानंतर शिंदे यांच्याकडे संख्याबळ वाढत गेल्याचे दिसून आले. दरम्यान आतापर्यंत शिंदे यांच्याकडे अपक्ष धरून 46 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना आमदारांच्या बंडाचा डाव एकनाथ शिंदे आणि भाजपने अत्यंत हुशारीने टाकल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा दिला तर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार बनण्याचा मार्ग सोपा आहे. आतापर्यंत शिवसेनेत छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे अशा तीन नेत्यांच्या बंडांपेक्षा एकनाथ शिंदे यांचे बंड मोठे आहे. जर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले तर त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसेल.
राज्यात सत्ता आल्यानंतर पक्षवाढीसाठी फायदा होतो. त्यामुळे भाजपला मोठा फायदा होईल. ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मिरा भाईंदर आदी महापालिकांमध्ये भाजप व शिंदे गट अशी युती होईल. या भागात शिंदेंचे प्राबल्य आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून जाऊ शकतात. शिवसेनेसाठी मोठे नुकसान आहे. दुसरीकडे पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार हे पुन्हा भाजपच्या गळाला लागू शकतील. शिंदे यांनी केवळ ठाणे, रायगडचे आमदार फोडलेले नाहीत, त्यांनी राज्यातल्या सगळ्या विभागांतील आमदार फोडले आहेत.