परिसरात कलम 144 लागू
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. मात्र धबधबे, धरणे, तलाव या ठिकाणी होणारे अपघात लक्षात घेऊन पावसाळी पर्यटनावर दरवर्षी बंदी घालण्यात येत असते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊननंतर आलेल्या पावसाळ्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्लॅन आखणार्यांचा हिरमोड झाला आहे. तालुक्यातील सर्व पाणवठे यांच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली असून, त्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.त्यामुळे पर्यटकांसह व्यावसायिकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. ही बंदी 9 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्दैवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये, याकरिता पर्यटनासाठी पर्यटकांना बंदी घालण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी काढले आहेत.
तालुक्यातील पर्यटनस्थळे
कर्जत तालुक्यातील अवसरे धरण, साळोख धरण, खांडस धरण, पाषाणे धरण, डोंगरपाडा धरण, पाली भूतिवली धरण, बेकरे कोल्हा धबधबा, कोमलवाडी धबधबा, बेडीसगाव धबधबा, टपालवाडी धबधबा, आनंदवाडी धबधबा, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, मोहिली धबधबा, वदप धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा, पळसदरी धरण व धबधबा, कोंढाणे लेणी-धरण-धबधबा, सोलनपाडा धरण-पाझर तलाव.
बंदीचे आदेश
गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणार्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणार्या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली करणे, सायंकाळी 6.00 वाजल्यानंतर ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत या कालावधीत धबधबे किंवा तलाव या ठिकाणी पाण्यात उतरणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस परिणाम, अडथळा होईल, अशा प्रकारे वाहन चालविणे, वाहनाची ने-आण करण्यावर ही बंदी असेल.
कारवाईचे आदेश
सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॉस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॉस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, महिलांची छेडछाड करणे, डीजे सिस्टीम वाजविणे, अत्यावश्यक सेवा वगळून धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश, आदी बाबींसाठी दि.10 जून ते दि.09 ऑगस्ट या कालावधीसाठी कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशाचे उल्लंखन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.