| पेण | वार्ताहार |
महामार्गाचे काम करत असताना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता नैसर्गिक पाणी निचरा होण्याचे स्त्रोत होते ते बंद झाल्याने पूर्ण कांदळेपाडा गाव व अंशताः कांदळे गाव पाण्याखाली गेला आहे. जानेवारी महिन्यापासून कांदळे गावचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी वेळोवेळी प्रशासनाला ठेकेदारांनी केलेली चूक निर्दशनास आणून दिली. परंतु प्रशासनाने गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष न दिल्याने गेली दोन दिवस पूर्ण गाव पाण्याखाली आहे.
प्रांतधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात वेळोवेळी बैठका घेऊन देखील नैसर्गिक पाणी निचरा होण्याचे मार्ग होते ते खुले करण्यात आले नाही. तसेच कांदळेपाडा गावातून येणार्या मुख्य नाल्याच्या मोरीचे काम देखील न केल्याने मोठया प्रमाणात पाणी तुंबत असून त्याचा फटका गावाला बसत आहे. महत्वाची बाब म्हणजे गेली 6 महिने ग्रामपंचायत कांदळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरणाशी व प्रांत व तहसिल कार्यालयांशी लेखी स्वरूपात आपली कैफियत मांडत असून देखील ठेकेदाराला प्रशासनाकडून झुकत माप दिल्यानेच आज कांदळेपाडा व कांदळे गावाची दैनीय अवस्था आहे. जर प्रांतधिकारी व तहसीलदारांनी बंद केलेली मोरी पुर्ववत करून दिली असती तर, सर्व सामान्य ग्रामस्थांचे संसार पाण्याखाली आले नसते. परंतु पावसाने झोडले आणि प्रशासनाने सोडले तर दाद कुणाकडे मागायची अशी स्थिती सध्या कांदळेपाडा व कांदळे गावाची झाली आहे.
तहसीलदार व प्रांतधिकार्यांनी पाहणी दौरे करून तुंबलेल्या पाण्याची समस्या सुटणार नाही. तर त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु असे प्रशासनाकडून झाले नाही. हे ही तेवढेच सत्य आहे. वेळेस ठेकेदाराला सांगून योग्य ती कार्यवाही झाली असती तर आज ही स्थिती झाली नसती. प्रशासनाने फक्त अश्वासनावर अश्वासन दिली. या पलिकडे काहीच केले नाही. आता तर कुठे पावसाला सुरूवात झाली आहे. जर वेळेवर आता नैसर्गिक पाणी निचरा होण्याचे मार्ग व मुख्य नाल्यांवरील मोरी खुली केली नाही तर पावसाभर कांदळेपाडा व कांदळेगावाला या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल. तसेच येथील दोन्ही गावांच्या आरोग्याला धोका देखील निर्माण होउ शकतो.
प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळेच आज कांदळे गावात शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. याची सवस्वी जबाबदारी प्रशासन व ठेकेदारांनी घ्यावी आणि सर्व सामान्यांची झालेली नुकसान भरपाई करावी.
– मुरलीधर भोईर (कांदळे सरपंच)
ग्रामस्थांच्या निवेदनाचा आधार घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास कांदळे ग्रामपंचायतच्या हद्दीतील नैसर्गिक पाणी निचरा होण्याचे मार्ग मोकळे करण्यास सांगितले होते. परंतु, तसे न केल्याने कांदळेपाडा गावामध्ये पाणी शिरले आहे. काही झाले तर आत युध्द पातळीवर नाल्याचे काम करण्यास सांगितले आहे.
– विठ्ठल इनामदार, प्रांत