नागरिक, प्रवासी पर्यटक हैराण; नगरपंचायतीचे दुर्लक्ष
| माणगाव | प्रतिनिधी |
शासनाकडून दरवर्षी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबविला जात असून, माणगावात मात्र स्वच्छतेचा पुरता बोजावरा उडाला असल्याचे दिसत आहे. माणगाव-मोर्बा रस्त्यावर गांधी राईस मिलच्या पुढे मोर्ब्याकडे जाणार्या पहिल्या पुलापर्यंत रस्त्याच्या कडेला प्रचंड कचरा पडला आहे. हा कचरा कुजल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरल्याने नागरिक, प्रवासी, पर्यटक हैराण झाले असून, या कचर्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.
माणगाव नगरपंचायत स्वच्छतेच्या बाबतीत बाजारपेठ वगळता शहरातील 17 वॉर्डातील वेगवेगळ्या भागात तेवढेसे लक्ष देत नाही. माणगाव-मोर्बा रस्त्यावर गांधी राईस मिलच्या पुढे मोर्ब्याकडे जाणार्या पहिल्या पुलापर्यंत कचरा गेली अनेक दिवसांपासून पडलेला आहे.हा कचरा कुजला असून, हळूहळू तो कचरा वार्यामुळे व पावसाच्या पाण्याने रस्त्यावर येत आहे. या रस्त्यावरून मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातून तसेच कोकणातून श्री क्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन बीच, दिवेआगर बीच याठिकणी जाण्यासाठी प्रवासी पर्यटक येत असतात.
तसेच या मार्गावरून रिला, पाचोळे, निलगुन, बामणोली आदी गावांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी पायी चालत शाळेत जाण्यासाठी माणगावात येत असतात. तसेच या भागातील अनेक ग्रामस्थ खरेदीसाठी अथवा शासकीय कामांसाठी माणगावात येत असतात. त्यांना याठिकाणी आल्यावर कचर्याच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे. माणगाव निजामपूर रस्त्यावर अमित कॉम्प्लेक्सच्या पुढेही वारंवार रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे याकडेही नगरपंचायत लक्ष देत नाही. वरवर याठिकाणी कचरा टाकला जात असूनही माणगाव नगरपंचायत याठिकाणी गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही. केवळ शहरातून स्वच्छतेच्या बाबतीत फेरफटका मारला जातो. अन्यथा बाहेरच्या भागांकडे तेवढेसे लक्ष नगरपंचायत देत नसल्याने हा स्वच्छतेचा बोजावरा उडाला आहे.त्यामुळे माणगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांकडून तसेच पर्यटक, प्रवासीवर्गातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.