| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील जंगलातील वणवे लागण्यामुळे वन्यजीव व वनसंपदा व एकूणच जैवविविधतेची मोठी हानी होतेय. सातत्याने हे वणवे लागतात, या वणवे लागण्यावर योग्य त्या व प्रभावी उपाय योजना करण्यात याव्यात. याबरोबरच जंगलातील वानरे पाली शहरातील नागरिकांच्या घरात येऊन उपद्रव करतात, यामुळे पालीकर नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर विषयांबाबत रोहन यशवंत राऊत व पदाधिकारी यांच्याकडून सुधागड पाली परिक्षेत्र वन अधिकारी रितेश नागोसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन डोबळे, ओमकार खोडागळे, सुरज गुप्ता, निखिल खामकर, विद्देश आचार्ये, ज्ञानेश्वर जगताप, सोहम खोडागळे, यश हजारे, अजिंक्य मराठे आदी उपस्थित होते.
जिल्हयातील सुधागड तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखण्यात येतो. यामुळे तालुक्यात मोठया प्रमाणात वनसंपदा व वन्यजीव आढळतात. पाली शहरालगत प्राचीन ऐतेहासिक सरसगड किल्ला आहे. या किल्ल्याच्या सभोवताली विविध प्रकारची वनसंपदा आहेत. तसेच या वनसंपदेत विविध प्रकारच्या वन्यजीव वास्तव करतात. मागील दोन ते तीन वर्षापासून सरसगडच्या पाथ्याशी अज्ञात कारणामुळे अग्नी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे येथे असणारी विविध झाडे झुडुपे तसेच गवत अग्नीमुळे खाक होत आहेत. या ठिकाणी लागणा-या वणव्यामुळे वन्यजीवाचे अस्तित्वही धोक्यात येते.
सरसगड हा किल्ला पाली शहरालगतच असल्यामुळे अचानक वणवा लागला तर पाली शहरातील घरांना मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. तसेच गेली दोन ते तीन वर्षांत वानरानी पाली शहरात प्रचंड उद्रेक मांडलेला आहे. त्यामुळे पालीतील सर्व सामान्य नागरिक वानरांच्या त्रासांमुळे हैराण झाले आहेत. या वानरांचा चा वावर फक्त जंगलात होता मात्र पालीतील रस्त्यावर घरांवर विविध ठिकाणी या वानरांचा वावर आढळून येत आहे. या वानरांमुळे पाली शहरातील सर्व सामान्य नागरिकांचे आर्थिक व शारीरीक नुकसान होत आहे.