आंदोलन सोडू नका; माजी आ. बाळाराम पाटील यांचे आवाहन
| पनवेल |:प्रतिनिधी |
नैना विरोधात एकजुटीनेच लढले पाहिजे, पुढच्या पिढीचं भल करायचं असेल तर सुरू असलेले आंदोलन सोडू नका, जास्तीत जास्त शेतकरी, ग्रामस्थ यांनी यात सहभागी व्हा, असे आवाहन विहीघर येथील गाव बंद आंदोलनात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले.
सुकापुर, आदई नंतर विहीघर येथे गाव बंद आंदोलन करण्यात आले. याला दुकानदार, व्यावसायिक, शाळा, ग्रामस्थ यांनी चांगला प्रतिसाद देत मेडिकल व्यतिरिक्त सर्व बंद ठेवण्यात आले होते. रस्त्यावर उतरलो तरच न्याय मिळेल आणि एकत्र येऊन लढू या. आत्म दहन करण्याची वेळ आली तरी करू, असे यावेळी नरेंद्र भोपी यांच्या वतीने सांगण्यात आले. जे खरोखर या आंदोलनात सहभागी होतात तेच खरे या मातीचे सुपुत्र असल्याचे शेखर शेळके यानी सांगत नैना शेतकरयासाठी कशी घातक आहे हे सांगितले. जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून सार्यांनी एकत्र यात या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती बाळाराम पाटील यानी केली.
भविष्यात या क्षेत्रामध्ये 80 लाख लोक राहण्यास येणार आहेत मात्र पाण्याचा कसलाच पत्ता नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विधिमंडळात सहावेळा नैनाचा मुद्दा उपस्थित केला, मात्र केवळ आश्वासने मिळाली. बैठक लावू, चर्चा करू असे सांगण्यात आले. मात्र कोणतीच बैठक झाली नाही.
बाळाराम पाटील, माजी आमदार
माणूस जगला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. याच्या उलट हल्ली केले जात आहे. रायगड मधील शेतकरी देशोधडीला लावला जात आहे. नैना आंदोलनाचा शेवट देखील आपल्याला करायचा आहे, यासाठी एकत्र येऊन सारे नैना विरोधात एकजुटीनेच लढले पाहिजे, असे उपस्थिताकडून सांगण्यात आले. मराठी शाळा, हायस्कूल देखील बंद ठेवण्यात आले होते. विहीघर येथील गाव बंद आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक हनुमान मंदिरात एकत्र आले होते.