सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तारू यांच्या प्रयत्नांना यश; 15 गावांना मिळणार दिलासा
। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा- गारभट मार्गावरील एसटी गेली कित्येक वर्षे बंद असल्याने येथील नागरिकांची मोठी अडचण होत होती. परंतु सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तारू यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी रोहा आगार प्रमुखांकडे सतत पाठपुरावा केल्याने त्यांच्या मागणीला यश आले असून मंगळवार दि.17 ऑगस्टपासून रोहा-गारभट-विठ्ठल वाडी एसटी सुरू झाली आहे.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तुकाराम तेलंगे, सरपंच रामचंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य-लक्षुमन धनावडे, रोशन बारस्कर, संतोष शिर्के, संजय मुसळे, अनिल शेडगे, अनंत शिर्के, यशवंत शेडगे, हनुमान मराठे, दिलिप गायकवाड उपस्थित होते.
मुंबई -गोवा महामार्गालगत पुगाव हद्दीतून नम्रता ढाब्याजवळून 15 गावांकडे जाणारा मुख्य रस्ता असून येथील वस्ती दुर्गम व घनदाट जंगलात आहे. तेथील नागरिकांची मुख्य बाजारपेठ कोलाड, रोहा असल्याने येथील नागरिक कोलाडला येत असतात. याच मार्गावरील ऐनवहाल पूल तूटलेल्या अवस्थेत असल्याने येथे एसटी बस सेवा बरीच वर्षे बंद होती. त्यामुळे येथील नागरिकांची मोठीं अडचण होत होती.
परंतु हा पुल आता दुरुस्त झाल्याने येथे पुर्वीप्रमाणे बस सेवा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तारू यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली येथील विठ्ठल वाडी, राज खळाटी, कांदले, बेलवाडी, बळे, गारभट, हंडे वाडी येथील नागरिकांनी रोहा आगार प्रमुखांकडे केली होती. त्यांनी केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे त्यांच्या मागणीला यश आले असून दि.17 ऑगस्ट पासून रोहा -गारभट -विठ्ठल वाडी ए टी सुरू झाली आहे. या वाहनाचे चालक एस. बी. सरलेकर, वाहक छाया घोरपडे असून ही एसटी रोह्यातून सकाळी 9 वाजता, दुपारी 3 वाजता सुटणार आहे तर विठ्ठलवाडी येथून 10 वाजता व सायंकाळी 4 वाजता सुटणार आहे.