चाकरमान्यांचा प्रवास खडतर; गणेशोत्सवापूर्वी रस्तेदुरुस्तीची मागणी
महाड | प्रतिनिधी |
कोकणातील गणेशोत्सवात गणेशभक्तांना सर्वात मोठा अडथळा मुंबई-गोवा महामार्गावरील खडतर प्रवास करण्याचा असतो. यावर्षीदेखील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक दिव्य पार करुन चाकरमान्यांना आपल्या गावी जावे लागणार आहे. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, त्याचबरोबर गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, याकरिता प्रशाससनाने वेळीच उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
कोकणातील प्रत्येक गावाचा मुंबईशी संबंध आहे. गावागावांतील तरुण मुंबईमध्ये कामधंद्याकरिता वास्तव्याला आहे. चाकरमानी दरवर्षी गौरी गणपती आणि होळीच्या सणाला आपल्या गावाकडे जातोच जातो. कोकणामध्ये जाण्याकरिता एकमेव मुंबई-गोवा महामार्ग आहे; परंतु दरवर्षी पावसाळ्यामध्ये महामार्गाची पूर्णपणे दुरवस्था होते. त्यामुळे त्रासाला चाकरमान्यांना सामोरे जावे लागते.
राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता असो किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असो. या राजकीय पक्षांनी कोकणची कायम उपेक्षाच केली आहे. 2011 मध्ये सुरु करण्यांत आलेले काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्याचबरोबर इंदापूर ते कशेडी हे दुसर्या टप्प्यातील काम सुरु करण्यात आले; परंतु या कामामध्येदेखील फारशी प्रगती झालेली दिसून येत नाही. आज पेण ते इंदापूरदरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरुन वाहन चालविणे अशक्य असल्याने प्रवासालादेखील विलंब लागत आहे. मुंबई ते महाडपर्यंत प्रवासाला चार तासांचा अवधी लागतो; परंतु पावसाळ्यामध्ये याच रस्त्यावरुन प्रवास करण्यासाठी 12-12 तास लागत आहेत.
महाड शहराजवळ असलेल्या केंबुर्ली गावाजवळ प्रचंड खड्डे पडले असून, गणेशोत्सवापूर्वी या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, त्याचबरोबर महाड तालुक्यातील नांगलवाडी, राजेवाडी फाटा, तसेच माणगाव तालुक्यातील विघवली, इंदापूर, रातवड, माणगाव येथील महामार्गावरील खड्डे त्वरित भरण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.