। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवस मार्गावरील मानीफाटा येथे गुरुवारी (दि.17) सायंकाळी अपघात झाला. या अपघातात नवेदर बेली येथील पती, पत्नीचा मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये हा अपघात झाला. विश्वास पाटील (48) व कल्पना पाटील (42) असे या पती, पत्नीची नावे आहे. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वास पाटील व त्यांची पत्नी असे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून अलिबागकडून रेवसकडे जात होते. सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मानीफाटा येथे आल्यावर मागून येणार्या कारची दुचाकीला जोरदार धडक लागली. या भीषण अपघातामध्ये दूचाकीमधील पती-पत्नी दोघांनाही गंभीर दूखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून मृतांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
पार्थचे छत्र हरपले
मानीफाटा येथे अपघातात मृत्युमुखी पडलेले पाटील दाम्पत्य मेहनती कुटुंब होते. विश्वास पाटील हे टेम्पोचालक होते. टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. विश्वास पाटील आणि कल्पना पाटील यांना पार्थ पाटील हा मुलगा आहे. पार्थने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. पार्थच्या डोक्यावरील आईवडिलांचा वरदहस्त इनोव्हा कार चालकाच्या चुकीमुळे हिरावला गेला आहे.
अलिबाग पोलिसांचा जमावावर लाठी हल्ला
अपघात घडल्यानंतर तातडीने त्याठिकाणी स्थानिक आणि रस्त्याने प्रवास करणारे नागरिक जमा झाले होते. अपघात झाल्याची खबर बेली गावात समजताच गावातून काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. ग्रामस्थ पोहचण्याअगोदर त्याठिकाणी सुमारे 200 पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. पोलीस येण्यापूर्वी संतप्त जमावाने इनोव्हा कार चालकाला बदडले आणि कारची नासधूस केली. दरम्यान अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे घटनास्थळी पोहचून त्यांनी हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु संतप्त जमावाने त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पोलिसांनी नागरिकांवर लाठी हल्ला करीत जमाव पांगवला.