वर्षापर्यटनावरील बंदीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न
| नेरळ | वार्ताहर |
मागील 20 वर्षात कर्जत तालुका पर्यटन तालुका बनला आहे. या भागातील पावसाळी पर्यटन आणि त्यासाठी आयोजित केलेल्या वर्षासहली यामुळे या तालुक्याचा व्यापार उदीम भरभराटीला आले होते. मात्र, प्रशासनाचे अधिकारी आपली जबाबदारी टाळण्यासाठी कर्जतचे पर्यटन संपवू पाहात आहेत असे दिसून येत असल्याचा आरोप होत आहे. अपघात होतात म्हणून कर्जत तालुक्यातील वर्षापर्यटनावर जमावबंदी आदेश लागू केले आहेत. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी वर्षा पर्यटनाचा हंगाम जोरात सुरु होता आणि फक्त कर्जत तालुक्याला जमावबंदी का, असा प्रश्न सामान्य जनता करू लागली आहे.
कर्जत तालुका पर्यटन तालुका म्हणून विकसित होत असताना पावसाळ्यातील चार महिने येथील पर्यटन आणखी खुलायचे आणि त्यामुळे कर्जत तालुका प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यात पर्यटक येऊ लागल्याने त्या त्या धबधबा किंवा धारणे पाझर तलाव यांच्या आजूबाजूला राहणार्या लोकांचा आर्थिक स्तर वाढला होता. पर्यटनासाठी आलेले पर्यटक बटाटा वडा पासून मक्याचे कणीसपासून तांदळाच्या भाकर्या घरगुती जेवण शीतपेय यासारख्या वस्तूंची जोरदार विक्री व्हायची आणि त्यातून स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र, प्रशासनाने मागील काही वर्षे अपघाताचे कारण पुढे करून कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठे यांच्या ठिकाणी येणार्या पर्यटकावर बंदी घातली आणि त्या त्या ठिकाणी येणार्या पर्यटकानावर करावी करण्याचे जाहीर केले. कलम 144 लावून जमाव बंदी करणार्यावर कारवाई होणार या भीतीने कर्जत तालुक्याचे पावसाळी पर्यटन मोडून काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
रायगड किंवा शेजारच्या ठाणे जिल्ह्यात सर्व पर्यटन स्थळावर पावसाळ्यात बंदी आहे, तरीदेखील तेथील पर्यटन जोरात सुरु आहे. कर्जत तालुक्यात 10 जूनपासून आतापर्यंत कोणालाही फिरकू दिले जात नाही, त्यामुळे अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सोलनपाडा येथील निसर्ग अनेकांना इच्छा असून पाहता येत नाही. त्याचा परिणाम जमावबंदी आणि कारवाईची भीती यामुळे पर्यटक येणे कमी झाले आहे. त्यामुळे स्थानिक लहान लहान धबधबे आणि मोठे प्रसिद्ध धबधबेदेखील ओस पडले आहेत.
कर्जत तालुक्यात प्रशासनाने असे निर्बंध लावताना स्थानिक प्रत्येक धबधबा आणि पाणवठे याठिकाणी जाऊन तेथील स्थानिक आणि व्यावसायिक यांच्यासोबत बोलून जमावबंदीचा निर्णय घ्यायला हवा होता, अशी सरळसरळ मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. तर, व्यावसायिक सागर शेळके यांनी प्रशासनाने आपल्या निर्णयाचा विचार करावा आणि पर्यटन सुरु ठेवावे, अशी मागणी करणारे निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केले. मात्र, आता ही जमावबंदी कर्जत तालुक्यासाठी शाप ठरत आहे. श्रावण महिना सुरु होईपर्यंत पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, जमावबंदी कायम असल्याने व्यावसायिकांनी यापूर्वी झालेले नुकसान आणखी होऊ नये यासाठी कोणतीही रिस्क घेतली नाही. मात्र, प्रशासनाच्या या एकमार्गी भूमिकेमुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन लयाला जाण्याची भीती आहे.
चौकट..
तालुक्यातील धबधबे
कर्जत तालुक्यातील अवसरे धरण, साळोख धरण, खांडस धरण, पाषाणे धरण, डोंगरपाडा धरण, पाली भूतिवली धरण, बेकरे कोल्हा धबधबा, कोमलवाडी धबधबा, बेडीसगाव धबधबा, टपालवाडी धबधबा, आनंदवाडी धबधबा, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, मोहिली धबधबा, वदप धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा, पळसदरी धरण व धबधबा, कोंढाणे लेणी-धरण-धबधबा, सोलनपाडा धरण-पाझर तलाव आदी ठिकाणी पर्यटनासाठी पावसाळयात पर्यटनासाठी येत असतात.
चौकट..
यावर्षी एकही अपघात झाला नसून, पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्यात पुढील वर्षापासून तरी किमान अशी बंधने नको, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे