महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चौकशी करणार का?
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील शहरीकरण झालेल्या नेरळ आणि ममदापूर ग्रामपंचायतीसाठी नळपाणी योजना राबविली आहे. त्या योजनेची दुरुस्ती नेरळ ग्रामपंचायत करीत असते. मात्र, मुख्य जलवाहिनी कापण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीने करून ही योजना खिळखिळी केली आहे. दरम्यान, मुख्य जलवाहिनी कापण्याचे आणि ती जलवाहिनी नवीन जागेत टाकली आहे, त्या कामाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चौकशी करणार आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील भागासाठी 1998 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नळपाणी योजना राबविली गेली. त्या पाणी योजनेसाठी ममदापूर गावासाठी आठ इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. त्यावेळी ही जलवाहिनी मोहाचीवाडी येथील टेकडीवरील जलकुंभ येथून महावितरणच्या कोतवालवाडी येथील कार्यलयाच्या बाजूने टाकली गेली. त्यानंतर ती जलवाहिनी ममदापूर गावाकडे गेली असून, आता तब्बल 25 वर्षांनी सदर जलवाहिनी तेथून उपटून टाकण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीने केले आहे. 25 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या आड आता तेथील जमीन अडचणीची ठरत आहे. ममदापूर येथे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायतीने ती जुनी आणि मुख्य जलवाहिनी कापून टाकली आहे. जुनी जलवाहिनी कापून ती जलवाहिनी दुसरीकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले गेले. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नेरळ ग्रामपंचायतीने कोणत्या कारणासाठी जलवाहिनी कापून टाकली आणि दुसर्या जागेतून वळविली याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीने जीवन प्राधिकरणाबरोबर पत्रव्यवहार केला आहे काय? याबाबत कोणतीही माहिती प्राधिकरणाला नाही.