। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील कामार्ले गावचे मुळ रहिवाशी तसेच आदर्श आगरी युवक मंडळाचे माजी अध्यक्ष बळीराम नागावकर यांचे रविवारी मुंबईतील सांताक्रुझ येथील राहत्या घरी पहाटे निधन झाले. निधनासमयी ते 78 वर्षांचे होते. आदर्श आगरी युवक मंडळाच्या 41 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 38 वर्षे त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी मंडळाला आणि मंडळाच्या नव्या-नव्या उपक्रमांना सर्वदूर पोहोचवितांना त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या हृदयात स्थान मिळविले होते. रायगडचे लोकनेते नारायण नागू पाटील हे हयात असताना त्यांच्या प्रेरणेने नागावकर मुंबईस गेले होते. मुंबईत जाताच त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारला होता. नागांवकर यांच्या निधनाने आदर्श आगरी युवक मंडळाचा भक्कम आधारस्तंभ हरपला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.