। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (दि.1) संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांच्यादृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता नोकरदारांना 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीनुसार 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर आकारला जाणार नाही. याशिवाय, 75 हजार रुपयांची कर वजावट (Tax Deduction) पकडून आता नोकरदारांना 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवेल, अशी चर्चा होती. मात्र, केंद्र सरकार इतकी मोठी सूट देईल, अशी अपेक्षा स्वप्नातही कोणी केली नव्हती. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत 12 लाख रुपयांचे उत्पन्न टॅक्स फ्री असेल, असे सांगताच अनेकांना विश्वासच बसत नव्हता. या घोषणेनंतर अनेकजण ही गोष्ट खरी आहे का, हे वारंवार तपासून पाहत होते. त्यामुळे निर्मला अक्कांच्या या घोषणेने अनेक सामान्य नोकरदारांना आनंदाने घेरी यायची बाकी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या निर्णयामुळे सामन्य नोकरदारांच्या हातात आता जास्त पैसे उरणार आहेत. कर न लागल्याने पगारातील रक्कम कापली जाणार नाही. त्यामुळे देशातील मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढेल आणि ते खर्च करताना हात सैल सोडतील, असा अंदाज आहे. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेमुळे आता बहुतांश करदाते नव्या करप्रणालीकडे वळण्याची शक्यता आहे. कारण जुन्या करणप्रणालीनुसार 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 25 टक्के कर लागू होतो. मात्र, आता नव्या करप्रणालीत झालेल्या बदलांमुळे 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 25 टक्के कर लागेल. त्यामुळे आता अनेक करदाते नव्या करप्रणालीकडे वळतील, असा अंदाज व्यक्त होतआहे.
नव्या करप्रणालीनुसार कर
0 ते 12 टक्के- शून्य कर
12 ते 16 लाख- 15 टक्के
20 ते 24 लाख- 25 टक्के
24 लाखांपेक्षा जास्त- 30 टक्के टॅक्स