। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यघटना जर वाचवायची असेल तर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे रोखठोक प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी उलवे येथे केले. काँग्रेसच्या ओबीसी सेल मंथन मेळाव्यात ते बोलत होते.
सोनिया गांधींना ईडीची नोटीस देऊन त्यांचा छळ करत आहात असा आरोपही त्यांनी केला. तसेच तुम्ही या माऊलीचा छळ करत आहात, तुम्हाला ही जनता शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारला बजावले.
संतांची शिकवण आणि शिवछञपतींची आठवण करून देत सर्व समाजांचा एक असा बनलेल्या या महाराष्ट्राची परंपरा आपल्याला पुढे न्यायची असल्याचे उपस्थित पदाधिकार्यांना सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेसला पुढे कसे न्यायचे हा विचार करा. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. नाही तर देश उद्ध्वस्त होईल. पक्षाची संघटना कशी मजबूत होईल याचाही विचार करा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.