| ठाणे | प्रतिनिधी |
महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडणार हे जवळपास स्पष्ट असले तरी याठिकाणी मुख्यमंत्र्यांचा उमेदवार कोण असेल याविषयी मात्र संभ्रम अजूनही कायम आहे. नवी मुंबईतील एका शासकीय सोहळ्यानिमित्त गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि या भागातील भाजपचे नेते गणेश नाईक एकत्र आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि नाईकांमधील देहबोली कमालीची सकारात्मक होती असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. नाईकांचा सत्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या असे म्हणतात. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना या दोन नेत्यांमधील आदरभावने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर माजी खासदार राहिलेले नाईकांचे पुत्र संजीव निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का अशी नवी चर्चाही यानिमीत्ताने सुरु झाली आहे.
ठाणे लोकसभेतील विधानसभा मतदारसंघांचे गणित लक्षात घेता यंदा भाजपने हा मतदारसंघ मिळावा यासाठी जोरदार आग्रह धरला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतो. शिवाय मुख्यमंत्री स्वत:ला ज्यांचे शिष्य म्हणवितात त्या शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी एकेकाळी भाजपच्या पदरातून ठाणे लोकसभा मतदारसंघ अक्षरश: खेचून आणला होता. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या पक्षालाच मिळेल याविषयी हळुहळू स्पष्टताही येऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात या पक्षाचा उमेदवार कोण असेल याविषयी तर्कवितर्कांना उत आला असताना अचानक माजी खासदार संजीव नाईक यांच्या नावाच्या चर्चेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.