चिराग फाऊंडेशन संस्थेतर्फे गावाला सहा सौर दिवे भेट
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पुणे जिल्ह्यालगतचे शेवटचे गाव असलेल्या ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे आवार सौर दिव्यांनी उजळून गेले आहे. चिराग फाऊंडेशन या संस्थेने गावातील चौक उजळविण्यासाठी शाळेसाठी असे एकूण सहा सौर दिवे दिले आहेत.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर स्टेशन ठाकूरवाडी हे गाव असून या गावातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा रात्रीच्या वेळी अंधारात असते. शाळेच्या परिसरात मोठी मोकळी जागा असून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी दाट अंधार असतो. त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत असे. शिक्षक वेच्या गावित यांनी चिराग फाऊंडेशन या संस्थेकडे ही समस्या उपस्थित केली होती. त्यानंतर चिराग फाऊंडेशनच्या काही पदाधिकार्यांनी स्टेशन ठाकूरवाडीमध्ये येऊन गावाची पाहणी केली. गावात वीज आहे, मात्र गावातील चौक कायम अंधारात आहेत. त्यामुळे शाळेच्या आवारासह गावातील चौकात सौर उर्जेवर चालणारे सहा दिवे भेट देण्याचा निर्णय या फाऊंडेशनने घेतला.
ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना
ठाकुरवाडीतील मोलमजुरी करणारे ग्रामस्थ दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात. त्यांच्या अनुपस्थितीत चिराग फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सोलर पॅनल स्वतः गावात आणून मेहनत घेऊन गावातील सहा ठिकाणी सौर दिवे बसवले. सायंकाळच्या सुमारास बाहेर गेलेले ग्रामस्थ घराकडे परतत असताना नेहमीच्या अंधाराच्या ठिकाणी अचानक दिव्यांचा प्रकाश पाहून त्यांना भलताच आनंद झाला. त्यात गावातील जिल्हा परिषद शाळेचे आवार देखील दिव्यांनी उजळलेले पाहून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोविंद कवटे यांनादेखील आनंद झाला. शिक्षक वेच्या गावित यांच्यासह शाळेतील संजय राठोड, ज्ञानेश्वर येळदरे व सहकारी शिक्षकांचे योगदान लाभले.
आम्हाला सौर दिव्यांचे महत्व गावातील चौका चौकात लावलेल्या दिव्यांमुळे कळले आहे. ते दिवे बसविण्यात येत असताना आम्हाला त्यांची मदत करता आली नाही याची खंत आहे. मात्र, जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही चिराग फाऊंडेशच्या अधिकार्यांना बोलावून त्यांचा आदर सत्कार करू.
– गोविंद कवटे, ग्रामस्थ