प्रशासकांना निवेदनाद्वारे लेखी तक्रार
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड शहरातील अंतर्गत रस्त्याकरिता शासनाकडून पाच कोटी मंजूर झाले होते. त्या रस्त्याकरिता नगरपरिषदेने निविदा जाहीर केली होती. त्याचे टेंडर वसुंधराला मिळाले. परंतु, ठेकेदार निविदाप्रमाणे काम करत नसल्याने जागरुक नागरिकांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांना निदर्शनास आणून देऊन लेखी तक्रार केली आहे. यावेळी मंगेश दांडेकर, मनोज भगत, मनोहर बैले, आशिष दिवेकर, हसमुख जैन, विश्वास चव्हाण, कैलास पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शेकापचे तालुका चिटणीस मनोज भगत यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंगेश दांडेकर म्हणाले, की मुरुड नगरपालिका हद्दीमधील सन 2015 साली रस्त्यांची डांबरीकरणाची कामे करण्यात आली होती. ती कामे अंदाज पत्रकाप्रमाणे न होता कामांमध्ये अनियमितता होती. त्यामुळे सदरची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली होती.त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला होता. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना सन 2016 पासून आजपर्यंत खूप शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही प्रशासकाला जागरुक करण्याचे काम करीत आहोत.
या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम 30 मार्चपासून सुरू झाले आहे. परंतु, कामामध्ये टॅक कोट मारलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी खड्डी उधळायला सुरुवात झाली आहे.सदरच्या रस्त्यांचे एमपीएमचे काम करत असताना अंदाजपत्रकात म्हटल्याप्रमाणे 70 टक्के हातफोड खडी वापरणे गरजेचे होते. परंतु, ठेकेदाराने संपूर्ण खडी ही क्रेशर ब्रोकन प्रकारची वापरली असल्याने एमपीएमची थीकनेस व मजबुती दिसून येत नाही. तरी प्रशासक यांनी घटनास्थळी पाहणी करून सुधारणा करण्यात यावी. या कामासाठी वापरलेली खडी पावसाळ्यामध्ये उधळण्याची शक्यता आहे. रस्त्यांचे काम करण्यापूर्वी मोरींचे काम होणे आवश्यक आहे. तरी या दोन्ही रस्त्यांवरचे स्लापड्रेनचे काम केलेले नाही.
आमचा लढा प्रशासकाबरोबर आहे, कोणा एका व्यक्तीबरोबर नाही. हे रस्ते चांगले व्हावे, हीच इच्छा. नागरिकांना त्रास होता कामा नये. – मनोज भगत, तालुका चिटणीस, शेकाप