। रायगड । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील नामांकित कंपनीत मोठा अपघात घडला. अनेकदा या कंपनीत असे प्रकार घडत असून, कंपनी प्रशासन मोठ्या शिताफीने ही प्रकरणं रफादफा करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉयलरमध्ये प्रेशर आल्याने पीटमध्ये असलेल्या कामगारांवर बॉयलरमधून गरम द्रव्य पडले. यामध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी मध्यस्थी करीत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देत फाईल बंद केली आहे. परिणामी, पोलिसांच्या मध्यस्थी भूमिकेमुळे कंपनी प्रशासनाला कायद्याचा कोणताही धाक राहिला नसून, कामगारांच्या जीवाशी कंपनीकडून खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अलिकडेच कंपनीत झालेल्या अपघातात दोन सख्ये भाऊदेखील काम करीत असून, एकजण पाणी आणण्यासाठी गेला तेवढ्यातच हा प्रकार घडल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, सख्या भावाचा यामध्ये मृत्यू झाला. कामगारांच्या नावांची यादी कृषीवलच्या हाती लागली असून, सर्व शहानिशा करुन लवकरच ही यादी तसेच कंपनीचे नाव प्रसिद्ध करण्यात येईल. या कामगारांमध्ये 19 वर्षीय तरुणाचाही समावेश होता. तर अन्य तिघेजण 24, 28 व 36 वर्षांचे होते. जग बघण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने त्याच्या कुटूंबियांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली असता कंपनीत घडलेल्या अपघाताची अन्य विभागातील कामगारांनाही कानोकान खबर नसल्याचे दिसून आले.
कंपनी प्रशासनाने तातडीने हे प्रकरण दाबून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मात्र, हे सर्व करीत असताना मृत्यूची नोंद तसेच त्यांचा शवविच्छेदन अहवालाबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. तर मयत कामगारांपैकी सर्व कामगार हे परप्रांतिय असल्याने त्यांचे मृतदेह कंपनीने कसे नेले? अन्य संबंधित विभागही आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबतची माहिती कृषीवलची टीम घेत असून, लवकरच त्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. याबाबत कंपनी प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी असा कोणताही अपघात घडला नसल्याचे सांगितले. मात्र, या घटनेनंतर कंपनीने संबंधित अधिकार्यांची कामावरुन हकालपट्टी केल्याची माहितीही समोर आली आहे.
ठेकेदाराचा मनमानी कारभार
कंपनीला कामगार पुरविणार्या ठेकेदाराने कंपनीने पैसे दिले नसल्याचे कारण मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना दिले आहे. कमवता मुलगाही गेला आणि कंपनीकडून एक रुपयाही पदरात पडला नसल्याने मृत व्यक्तींचे कुटुंबिय हतबल झाले आहे. याबाबत कंपनीसह ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
15 लाखाची मदत कागदावरच
कंपनीमध्ये झालेल्या अपघातात मृत व्यक्तींना 15 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे पोलिसांसमक्ष सांगण्यात आले होते. या घटनेला महिने उलटले तरी अद्यापही त्यांना एक रुपयादेखील मिळालेला नाही. कंत्राटदाराकडून त्यांना केवळ तारिख पे तारिख दिली जात असल्याचे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.