बामणगावमध्ये रेवस-रेड्डीसाठी धोकादायक प्लांटची उभारणी

प्लांट विरोधात कारवाईची स्थानिक प्रशासनाकडे मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-वावे मार्गावरील कावीर गावानजीक रस्त्याला लागूनच रेडी मिक्स काँक्रिट तथा आरएमसी प्लांट उभारण्यात येणार आहे. हा भाग कृषी व रहिवासी क्षेत्राचा असल्याने औद्योगिक प्रकल्प उभारणे बेकायदेशीर आहे. अशातच या उद्योगाच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही ठेकेदाराने प्लांटसाठी लागणारे मटेरिअल त्या ठिकाणी आणले आहे. तसेच, लवकरच हा प्लांट सुरु करणार असल्याचे तेथील कर्मचार्‍यांच्या बोलण्यातून आले. त्यामुळे आमदारांच्या दबावामुळे आणि जिल्हाधिकार्‍यांच्या सहकार्याने हा उद्योग होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांनी ग्रामसेवकासह संबंधित शासकीय विभागाकडे दिले आहे. या प्लांटपासून हाकेच्या अंतरावर दोन शाळा आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्लांटमधून होणारी धूळ, सिमेंट कणामुळे श्‍वसनाबरोबरच डोळ्यांचे व त्वचेचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा प्लांट नागरिकांसह महिला, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असल्याने तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही शेतकर्‍यांनी केला आहे. या अवैध प्लांटविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अमित म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, कावीर गावाचा परिसर रहिवासी व शेती क्षेत्र म्हणून घोषित आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती असून, शेती करणार्‍यांची संख्यादेखील प्रचंड आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कावीर गावानजीकच अलिबाग-वावे रस्त्याच्या बाजूला आरएमसी प्लांट उभारण्यास सुरुवात झाली आहे. चेन्नई येथील ‘आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट’ या कंपनीमार्फत ते काम केले जाणार आहे.

या परिसरातील आंबा व इतर पिकांच्या क्षेत्राला धोका निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर सुरु असलेल्या या प्लांटला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. तरीदेखील ठेकेदाराकडून या ठिकाणी काम सुरु आहे. त्यामुळे नाराजीचे सुरू उमटू लागले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यापासून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही लेखी पत्र देण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या प्लांटच्याविरोधात जिल्हा, तालुका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

आमदार ठेकेदारांच्या पाठीशी; स्थानिकांना पोलिसांच्या धमक्या
कावीर गावानजीक उभारण्यात येणार्‍या रेडी मिक्स काँक्रिट तथा आरएमसी या प्लांटला काही स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. परंतु, विद्यमान आमदार दळवी यांनी शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांसह पोलिसांच्या धमक्या देत दबावतंत्र सुरु केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ठेकेदारांना अभय आणि स्थानिकांना पोलिसांच्या धमक्या या आमदारांच्या भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी उमटली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाच्या कामासाठी लागणारे मटेरिअल तयार करण्यासाठी प्लांट उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी प्रक्रिया सुरु आहे.

विजय म्हापूसकर,
मंडळ अधिकारी

Exit mobile version