गॅस्ट्रोची लागण होण्याची शक्यता
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील मेंदडी, तुरूंबाडी, वारळ, काळसुरी या चार गावांना काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, गॅस्ट्रोची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, वरील गावांना मेंदडी, जिल्हा परिषद पाझर तलावातून स्वतंत्र योजनेद्वारे पाझर तलावाच्या खाली असलेल्या विहिरीतून पंपाद्वारे साठवण टाकीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्यातील जलपर्णी वनस्पती आणि चिखलामुळे पाण्याला वास आणि रंग येत असल्याचे समजते. या परिसरातील वारळ, तुरूंबाडी या गावांत 2012 साली ग्रॅस्टोची लागण झाली होती.
तलावात असणार्या जलपर्णी, जलकुंभी, परदेशी लव्हाळ्यांच्या विविध जाती, वनस्पती बरोबर काही कीटकांचे जैविक आक्रमण होते तसेच जलप्रदूषणामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असतात, त्यात पाण्यातील गढूळ पाणीसुध्दा एक भाग असू शकतो, तर अनेकदा स्वच्छ व नितळ दिसणार्या पाण्यामध्येही अंतर्गत दूषित स्त्रोतामुळे पाण्यातील प्रदूषण वाढते. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. या सर्व गोष्टींचे परिणाम वेळीच लक्षात घ्यायला हवेत. यामुळे पाणीटंचाई काळात तालुक्यातील आमदार, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता यांच्या समन्वयांतून तालुका पाणीटंचाई आराखडा बनविण्यात येतो. त्या अभ्यासामुळे वारळमधील नागरिक शकील साटविलकर आणि सुनित सावंत यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता यांना निवेदन आणि दूषीत पाण्याचे नमुने दिले आहेत. ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ वारळसाठी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, अशी विनंती केली आहे.
प्रशासकीय स्थिती दोलायमान
वारळ येथील ग्रामस्थ दूषित पाण्याचे नमुने घेऊन कार्यालयात आले असता, त्यांनी मार्च माहिना असल्याने निवेदन टपालात, तर पाणी नमुने तपासणीला असे स्पष्ट सांगितले. गटविकास अधिकारी यांच्याकडे पेणचा चार्ज, पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे रोह्याचा चार्ज असल्याने तिन्ही निवेदने संबंधितांना पोहोचेपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांनी टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पुढे येत आहे.