। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘माणुसकी’ प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र ही टीम यावर्षीदेखील पर्यावरणपूरक व निर्मल गणेशोत्सव साजरा करत आहे.
माणुसकी प्रतिष्ठान संस्था ही ग्रामस्थ, इतर सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत, मंडळ यांना प्रोत्साहन देत गणेशोत्सव राबवत आहे. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते, तर त्यासाठी माणुसकी प्रतिष्ठानने जितनगर येथे कृत्रिम तलावाची निर्मिती करून यामध्ये मातीपासून बनवलेले गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले.
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सर्वांना प्लास्टिक व निर्माल्य संकलन करून त्याचा योग्य ते विल्हेवाट लावण्यास आवाहन केले, तसेच हे सर्व करत असताना उत्साहात कुठे देखील कमी पडणार नाही याची काळजी घेतली.
यावेळी कार्याध्यक्ष तानाजी आगलावे, सल्लागार अमृत म्हात्रे, संपर्क प्रमुख गौरव माळी, डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ. अश्विनी हुलवान तसेच ग्रामस्थ व संपूर्ण माणुसकी टीम हजर होती. गौरव माळी यांनी सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.