बदलते हवामान-अवकाळी पावसाने बागायतदार उध्वस्त
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
आंबा हा फळांचा राजा आहे हे जगमान्य झालेले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. कोकणातील हापुस चविसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचे चित्र दिसुन येतेय. कोकणातील आंबा उत्पादकांना बदलते हवामान, ऊष्मा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. आंबा बागायतदार पुर्णपणे कोलमडून गेला आहे. यंदा हापूस आंबा चाखायला तरी मिळेल की नाही ही धास्ती शेतकर्यांना सतावतेय. आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा तसेच महारष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र 3,57,290 हेक्टर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होत असून त्यापासून शेतकर्यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळत आहे.हापूस आंब्यापाठोपाठ इतर विभागातील केशर आंबाही मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आंब्यापासून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळत आहे. परंतु, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होतांना दिसून येते. रायगड जिल्ह्यात साधारण त 56 ते 60 हजार इतके आंबा बाग़ायत दार आहेत. तर कोकणात आंबा लागवड खालील क्षेत्र मोठे असल्याने साधारण त साडेचार लाख आंबा बाग़ायतदार असल्याची माहिती मिळते.
बदलत्या हवामानामुळे यावर्षी 1, 2 डिसेंबर 2021 रोजी अवकाळी पाऊस झाला. तसेच ऊष्मा देखील वाढला आहे. त्यामुळे आंब्याला खास करून पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर कुजून गेला. मावा व तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात आंब्यावर प्रादुर्भाव झाला. आंबा उत्पादकांनी महागडी कीटकनाशके, पेस्टीसाईडस् व बुरशी नाशके यांचा वापर करून प्रचंड मेहनत केली. मोहर धरला मात्र मोहरात नर फुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे फळधारणा झाली नाही.त्यामुळे या वर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा वाईट झाला आहे. जेमतेम 10 ते 15 टक्के उत्पन्न मिळणार असल्याची चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे.
यावर्षी हवामान बदल होत प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपुर्ण कोकणात 2 डिसेंबर रोजीच्या पावसाने आंबा बागायतदार यांचे कंबरडे मोडले. 30 तास सलग पाऊस व हवा यामुळे आंबा मोहर गळून पडला, तसेच पाण्याची पातळी वाढल्याने आंबा मोहर येण्याची प्रक्रिया मंदावली. डिसेंबर महिना आंबा बागायतदार यांच्यासाठी निराशाजनक गेला. अगोदर जो मोहर आला तो बुरशी व बुरशीजन्य रोगांनी नुकसान झाले.
डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार
चार वेळा मोहोर आलाय. मोहर सतत गळून पडतोय. फवारणी व इतर खर्च न परवडणारे आहे. आंबा बागायतदार खचून गेलाय. बँका कडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणातील शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा.
चंद्रकांत पाटील, कार्लेखिंड, आंबा बागायतदार शेतकरी