। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत असताना रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. येत्या दोन-चार दिवसांत कोकणाला चक्रीवादळाचा धोका आहे, अशी चर्चा आहे. परंतु, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली.
भारतीय हवामान खात्याच्या परिपत्रकानुसार अंदमान-निकोबार व बंगालचा उपसागर या भागातील हवामान बदलामुळे काही वादळसदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास तेथील मच्छीमारांच्या बोटींना कोकणच्या सागर किनारी भागात आश्रय देण्याविषयी विनंती करण्यात आलेली आहे. मात्र, कोकण किनार्यावर भागात कोठेही चक्रीवादळाचा धोका नाही, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यलयाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये जिल्हा माहिती कार्यालयाकडुन करण्यात आले आहे.त्यामुळे कोकणवासीयांनी तुर्तास सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यापूर्वी ’निसर्ग’ आणि ’तौक्ते’ या चक्रीवादळांमुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांची घरे आणि उत्पन्नाचे साधन असलेली आंबा-काजुच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळेच पुन्हा चक्रीवादळ येणार, या शक्यतेने नागरीक घाबरले होते. परंतु, आता जिल्हाधिकार्यांच्या स्पष्टीकरणानंतर कोकणवासियांचा जीव भांड्यात पडला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. तर दुसरीकडे पाचगणीच्या टेबल लॅन्डवर रविवारी महाकाय वावटळ आली होती. यामुळे या परिसरातील काही दुकानांचे नुकसान झाले. वावटळीचा आकार पाहून पर्यटक आणि स्थानिक भयभीत झाले होते.