| नवीन पनवेल | वार्ताहर |
अंत्यविधीसाठी लागणारी तिरडी, सीसीटिव्ही कॅमेरा व दुंदरे गावासाठी गणेश घाट व नदीवर बंधारा बांधण्याची मागणी मनसेचे विश्वास पुंडलिक पाटील, गुरूनाथ भोपी, दिनेश मांडवकर यानी ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अंत्यविधीसाठी लागणारी तिरडी ही बांबूच्या (बेटाच्या) दांडूकांपासून बनविली जाते. अंत्यविधीच्या वेळी तिरडीचे बांबू सुध्दा सरणावर रचून जाळले जातात. त्यामुळे भविष्यात तिरडीसाठी लागणारे बांबू सुध्दा मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून मासिक मिटींगमध्ये ठराव घेवून लोखंडी (स्टेनलेस स्टील) च्या तिरडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणा-या प्रत्येक गावाला एक याप्रमाणे बनवून दयाव्यात. तसेच वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दुंदरे गावच्या प्रवेशव्दारावर सी.सी.टी. व्ही कॅमेरा बसविण्यात यावा. जेणेकरून त्याचा गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल.
येत्या 31 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. तत्पूर्वी दुंदरे गावच्या प्रवेशव्दारापासून ते शिवणसई-आंबे गावापर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून घ्यावे. जेणेकरून गणेश भक्तांना त्याचा त्रास होणार नाही. तसेच दुंदरे गावातील गणेश भक्तांना गणपती विसर्जनासाठी नदीवर घाट नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. त्यामुळे नदीवर नविन गणेश घाट बांधण्यात यावा व गणेश घाटाला लागूनच नदीचे पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात यावा जेणेकरून उन्हाळयाच्या दिवसात त्या पाण्याचा महिलांना कपडे धुण्यासाठी, गुरांढोरांना पिण्यासाठी उपयोग होईल. अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.