| खोपोली | प्रतिनिधी |
भातावर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांनी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणार्या जाती विकसित कराव्या, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले. 57 व्या महाराष्ट्र राज्य भात वार्षिक गट चर्चेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते होते. व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस.जी.भावे, हैद्राबाद येथील भारतीय भात संशोधन संस्थेच्या वनस्पती पैदास विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए.व्ही.एस.आर. स्वामी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर.एल. कुणकेरकर, वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.एस. जोशी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस.बी. भगत, भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे उपस्थित.
डॉ. सावंत पुढे म्हणाले की, खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर सुटी होऊन रक्तप्रवाहात हळूहळू येते की पटकन येते यावर ग्लायसेमिक इंडेक्स ठरविला जातो. 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर मधुमेही व्यक्तींसाठी योग्य समजल्या जातो. ते म्हणाले की, बदलत्या वातावरणात तग धरणार्या तसेच वैरणीसाठी व जैवइंधन निर्मितीसाठी उपयोगी पडतील, अशा जाती विकसित करण्यावर शास्त्रज्ञांनी भर देण्याची गरज आहे. जलद पैदास पद्धतीचा (स्पीड ब्रिडिंग) अवलंब करून कमी कालावधीत अधिक उत्पादन देणार्या जातींची निर्मिती करण्याचा सल्ला त्यांनी दिला. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सामूहिकपणे व एकदिलाने संशोधन करण्याची तसेच प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्या अधिनस्थ व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
डॉ. एस.जी. म्हणाले की, बदलत्या आवडीनिवडीनुसार भाताच्या निर्मितीसाठी उद्दिष्टे बदलली पाहिजेत. 20 वर्षांनंतर लोकांची काय गरज असेल, हे हेरून त्यादृष्टीने काम करायला हवे. उद्योगाची गरज भागविण्यासाठी भाताच्या प्रती चौरस मीटरमधून जास्तीत जास्त लोह, पोटॅश, प्रोटीन कसे मिळवता येईल, याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे. नवनवी पिके घेत असताना भाताखालील क्षेत्र कमी नाही, याची दक्षता घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. एस.बी. भगत यांनी केंद्राच्या विविध योजनांचा व विकसित केलेल्या भात जातींचा आढावा घेतला. प्रास्ताविकात डॉ. बी.डी. वाघमोडे यांनी राज्यातील वेगवेगळ्या संशोधन केंद्रातून 57 वर्षात विकसित केलेल्या भात जाती आणि संशोधनाच्या भावी दिशा तसेच मागील वर्षी शेतकर्यांसाठी शिफारस केलेल्या भात जातींचा घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू व अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर केंद्राच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्परोप व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य समन्वित भात सुधार कार्यक्रम-खरीप 2022’च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी आभार भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्राच्या चारही कृषी विद्यापीठातील भातावर संशोधन करणारे निवडक शास्त्रज्ञ तसेच विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्राचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.