नागरिकांसह वाहनचालक त्रस्त
सुधागड-पाली | वार्ताहर |
अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या पालीत रस्त्यांची खूप दुरवस्था झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून मार्ग काढणे जिकरीचे झाले आहे. यामुळे नागरिकांसह वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात खराब रस्त्यामुळे भाविकांची व खरेदीसाठी पालीत येणार्या नागरिकांची खूप गैरसोय होणार आहे. पाली स्टेट बँक पासून गांधी चौक, महावीर मार्ग ते थेट गणेश मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आगरआळी, सावंतआळी, रामआळी ते मधल्या आळी पर्यंतचा रस्ता, भोई आळी, मिनिडोअर स्टँड ते बसस्थानक पर्यंतच्या रस्त्याची भल्या मोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. त्याचबरोबर बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणारा रस्ता प्रचंड फुटला आहे. पावसाचे पाणी या खड्डयात साठल्याने वाहन चालकास खड्डयाचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन जोरात खड्डयात आदळते. त्यामुळे पाणी व चिखल पादार्यांच्या अंगावर उडते. खड्ड्यातील बारीक खडी पसरल्याने वाहने घसरतात. दुचाकीस्वारांना चालतांना कसरत करावी लागते. पादचार्यांना येथून मार्ग काढतांना अडचणी येतात. महिला व वृद्धांची तर खूपच गैरसोय होते. खड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होत आहे. प्रत्येकजण या खराब रस्त्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
उपाय कुचकामी
काही दिवसांपूर्वी येथील खड्ड्यात तात्पुरत्या स्वरूपात बारीक खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र सततचा पाऊस आणि वाहनांची रेलचेल यामुळे खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आता तर हे खड्डे आणखी खोल व रुंद झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र अतिवृष्टीमुळे पुन्हा खड्डे झाले. पालीतील रस्ते दुरुस्तीसाठी निधी आला आहे. पण पावसाळ्यात काम करता येणार नसल्याने ऑक्टोबर महिन्यात रस्ते नूतनीकरणाचे काम करण्यात येईल.
दिलीप रायण्णावार, प्रशासक, नगरपंचायत, पाली