। वावोशी । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील नंदनपाडा गावाच्या वेशीवर असलेल्या अरुंद पुलावर शुक्रवारी (दि. 09) पहाटे एक भीषण अपघात घडला. माल घेऊन इंडोस्पेस कंपनीकडे निघालेला कंटेनर नंदनपाडा दिशेने जात होता. दरम्यान अरुंद पुलावर वळण घेताना गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर सुमारे 15 फूट उंचीवरून नदीत कोसळला. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त कंटेनर (एमएच-08-डब्ल्यू-4353) इंडोस्पेस कंपनीकडे माल घेऊन जात होता. मात्र, पहाटे अंदाज चुकल्याने चालक चुकीच्या मार्गावर गेला. दरम्यान, नंदनपाडा गावाजवळील जीर्ण व अरुंद पुलावर वळण घेताना गाडीचा तोल गेल्याने कंटेनर खाली कोसळला. यावेळी कंटेनरमधील चालक धनेंद्र साहू (वय 25, रा. मध्यप्रदेश) याने उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीतील कातळांवर पडल्याने गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यावर कोसळलेल्या कंटेनरमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला असून, सुमारे 8 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हायड्राच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.