‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा सर्वधर्मियांकडून जल्लोष
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
पाकिस्तानने पहलगामात भारतीय पर्यटकांवर करण्यात आलेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे ठोस प्रत्युत्तर दिले. या सैनिकी कारवाईत भारताने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करत जागतिक स्तरावर आपली लष्करी ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली. या यशानंतर रेवदंडा गावात सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला.
गावातील मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वार्याचे प्रतिनिधी एका व्यासपीठावर एकत्र आले आणि देशासाठी प्रार्थना करत भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला. गावात विविध ठिकाणी फटाके फोडून, तिरंगा फडकावून आणि ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’, ‘भारतमाता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमात न्हाऊन निघाला. गावकर्यांनी विशेष सभेचे आयोजन करत ऑपरेशनमध्ये सहभागी जवानांचे आभार मानले व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी गावाचे सर्वपक्षीय पुढारी, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, युवक मंडळांचे सदस्य आणि सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशासाठीची एकात्मता आणि समर्पण यांचे हे दृश्य रेवदंडा गावासाठी प्रेरणादायी ठरले.