| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात सध्या सिमेंटचे जंगल उभारले जात असतानाही अनेक ग्रामीण भागात आजही विटभट्टी व्यवसाय तग धरुन आहे. परंतु, गेल्या तीन दिवसामध्ये अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने या विटभट्टी मालकांचे चांगलेच नुकसान केले आहे.
सोसाट्याच्या वार्यासह ढगांच्या गडगडाटाने आणि विजांच्या कडकडाटाने अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने वीटभट्टी मालकांवर अवकळा आल्याची स्थिती झाली आहे. संततधारेने वीटभट्टीच्या शेवटच्या टप्प्यात या व्यवसायाला चांगलाच तडाखा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून वीटभट्ट्यांचे नुकसान मालक टाळण्यासाठी वीट आणि कामगारांची कच्च्या विटांवर ताडपत्री आणि प्लास्टिक कापड टाकण्यासाठी धावपळ झाली. एप्रिल- मे महिन्यात कडक उन्हाळा असल्याने विटांचे उत्पादन मोठ्या संख्येने घेता येते. त्याचप्रमाणे या उन्हाळी वातावरणात कच्ची वीट सुकल्यानंतर ग्रामीण भागात वीटभट्ट्या देखील मोठ्या संख्येने लावल्या जातात. या पोषक वातावरणात वीट उत्तमप्रकारे भाजून निघतात. एकाचवेळी भट्टया लावण्यासाठी काही व्यावसायिक केवळ भट्टया रचून देखील ठेवतात. मात्र, अवकाळी पावसाने मातीच्या कच्च्या विटांचा तयार माल पावसात भिजून संपूर्ण विटांच्या मालाची नासधूस झाली आहे.