चिंचवाडीमधील पाणीसंकट गंभीर
| नेरळ | संतोष पेरणे |
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतमधील चिंचवाडी या आदिवासीवाडीसाठी राबविण्यात येत असलेली नळपाणी योजनेचे काम अनेक महिने रखडलेले आहे. त्यामुळे या वाडीमधील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, दुर्गम भागातील चिंचवाडीमधील महिलांची पाण्यासाठी डोंगर उतरून आणि नंतर रस्ता पार करून पाणी आणावे लागत असल्याने कसोटीची वेळ सुरू आहे.
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीत येणार्या चिंचवाडी ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. येथे शासनाकडून जलजीवन योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेचे काम अनेक महिने बंद अवस्थेत आहे. शासनाने नेमलेल्या ठेकेदार हा योजनेचे काम करीत नसल्याने शेवटी नवीन ठेकेदार नेमावा लागला. परिणामी जलजीवन मिशन योजनेचे काम रखडलेले असल्याने या वाडीमधील महिलांना डोंगर भागातून चढउतार करून डोक्यावरून पाणी आणावे लागते. जलजीवन मिशन योजनाचे काम पूर्ण न झाल्याने चिंचवाडी गावातील महिलांचा डोक्यावरचा हंडा कधी उतरणार? असा स्थानिक महिलांनी सवाल करत संताप व्यक्त केला आहे. कर्जत तालुक्यातील अनेक भागात एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई दिसून येते. मात्र, यावर प्रशासन ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
पंतप्रधान जलजीवन मिशन योजना कर्जत तालुक्यातील सुमारे 126 गावात ही योजना राबविली गेली असली तरी प्रत्यक्षात यात सुमारे 60 टक्के कामे आजही ही अपूर्ण आहेत. खांडस, नांदगाव, ओलमन या भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भागात शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणी पुरवीले जाते.
पोशीर ग्रामपंचायत हद्दीत येणार्या चिंचवाडी गावात सुमारे 60 घरांची वस्ती आहे. या गावात शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु असून हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसते. साठवण टाकीचे काम पूर्ण न झाल्याने वंजारपाडावरून आलेल्या लाईनने पाणी गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत सोडले जाते, त्यानंतर हे पाणी महिला आपल्या डोक्यावरून पाणी वाहून आणतात. वृद्ध महिला, लहान मुले, पुरुषदेखील डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणतात. डोंगर चढउतार भाग असल्याने महिलांना आपला जीव मुठीत घेऊन डोक्यावरून पाणी वाहून आणावे लागते. असे असतानादेखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का?, असा प्रश्न येथे उपस्थित होतो आहे.
संतप्त महिला..
गेली तीन महिने झाले नळ बसविले आहेत, मात्र अजून आम्हाला पाणी मिळत नाही. तसेच पाण्याची टाकीच कामदेखील अपूर्ण आहे. आम्हाला आता पाण्याची खरी गरज आहे तरी आम्हाला पाणी मिळत नाही. मला मणक्याचा त्रास आहे. पाणी आणण्यासाठी डोंगरातून रस्ता असल्याने मला चालताना त्रास होतो. तसेच, पुरेसे पाणी नसल्याने 2 किमीवरून बंगल्यावरून खाजगी बोअरवेलचे पाणी आणावे लागते. पाणी भरण्यासाठी दिवसाचा पूर्ण वेळ जातो बाकीची कामे करायला वेळ मिळत नाही.
चिंचवाडीसाठी राबविण्यात येत नळपाणी योजनेचे काम ठेकेदाराकडून केले जात नव्हते. त्यामुळे जुना ठेकेदाराचा ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमला आहे. आता योजनेचे काम सुरू असून पाणी योजना पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.
– अनिल मेटकरी, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग