| पाताळगंगा | वार्ताहर |
दमदार पावसामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला असून, राबदेखील लागवडीयोग्य झाले आहेत. परंतु, मजुरांअभावी लावणीची कामे खोळंबली आहेत. तरीसुद्धा जिद्दीने आणि जोमाने बळीराजा भातलागवड करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. जिकडे तिकडे भातलागवड सुरु असून, या कामासाठी मजुरांची मनधरणी सुरु आहे.ज्यांची कमी भातशेती आहे, त्यांची भातलागवड पूर्ण झाली आहे. तर, काहींची मजुरांअभावी कामे खोळंबली आहे. मिळेल त्या मजुरांना घेऊन भातलागवड गेल्या आठवड्यापासून सुरु झाली आहे. गेले अनेक दिवस शेतामध्ये पाणी नव्हते, यामुळे राबांची वाढही होत नव्हती.परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाचे आगमन दमदार झाल्याने शेतकरी सुखावला असून, भातलावणीच्या कामांनी वेग घेतल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.