| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता विधानपरिषदेच्या या 5 जागांवर कोणाचा नंबर लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, 27 मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या 3, राष्ट्रवादी अजित पवार 1 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 1 आमदारांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार केवळ आमदारांना असणार आहे. सध्या, राज्यात भाजप महायुतीला मोठं बहुमत असल्याने या जागांवर पुन्हा संबंधित पक्षाचेच उमेदवार विजयी होतील. मात्र, राजकीय पक्षांकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेवर असलेल्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप गोपीचंद पडळकर आणि भाजपा रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आता, या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम ?
10 मार्च ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया
अर्जाची छाननी 18 मार्च रोजी होणार
20 तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
27 तारखेला विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.