। अकोला । प्रतिनिधी ।
अकोल्यात एका अल्पभूधारक शेतकर्याने केवळ 20 हजार रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवानंद सुखदेव इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव असून शेतातीलच आंब्याच्या झाडाला गळफास घेत त्यांनी आपले जीवन संपवले. अतिवृष्टी व कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळेच या शेतकर्यानं आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निमकर्दा येथे देवानंद इंगळे राहात होते. मृत इंगळे यांच्याकडे जवळपास मुद्दल आणि व्याजाची रक्कम मिळून 20 हजार रुपयापेक्षा अधिक कर्ज होते. इंगळे यांच्याकडे एकर शेती होती, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून इंगळे यांनी आत्महत्यासारखं टोकाचा पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सेवा सहकारी सोयायटीच्या सचिवांनी गाव तलाठ्यांना पत्र लिहून या कर्जाबाबतची माहिती दिली आहे. देवानंद इंगळे या शेतकर्याने आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सन 2022 चे पीकर्ज रुपये 15000 आणि 5400 रुपये व्याज अशी एकूण 20,450 रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. मयत सभासदाच्या कर्जाची माहिती देण्यात येत असल्याचे सांगत सोसायटी सचिवांनी हे पत्र तलाठी महोदयांना दिले आहे.