पंचनामे होतात…पण मदत कुठे?
कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ग्रामीणचे ना. आदिती तटकरेंना निवेदन
| माणगाव | प्रतिनिधी |
कोकणातील शेतकरी यंदा निसर्गाच्या दुहेरी संकटाने अक्षरशः कोलमडून गेला आहे. सुरुवातीला कडक उन्हामुळे पेरणी केलेली पिके करपून गेली. हातचे पीक वाचवण्यासाठी कर्ज काढून, पुन्हा बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र निसर्गाने पुन्हा एकदा निर्दयी तडाखा दिला. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली. शेतांमध्ये तब्बल आठ दिवस पाणी साचून राहिल्याने दुबार पेरणीही पूर्णपणे नष्ट झाली. एका हंगामात दोनदा झालेल्या या प्रचंड नुकसानीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
या परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ग्रामीण यांच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. आदिती तटकरे यांची भेट घेऊन अध्यक्ष विजय बक्कम आणि मार्गदर्शक शंकर उभारे यांनी मंडळाच्या वतीने निवेदन सादर केले.
निवेदनात शेतकऱ्यांच्या भावना मांडताना स्पष्ट करण्यात आले की, दरवर्षी पंचनामे होतात; अधिकारी येतात, पाहणी करतात, कागदपत्रे तयार होतात; मात्र प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळतच नाही. शासनाच्या कठोर निकषांमध्ये अनेक नुकसानग्रस्त शेतकरी बसत नसल्याने त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी असा आरोप केला की, दोन वेळा झालेले नुकसान शासनाच्या नियमांमध्ये मोजले जात नाही. परिणामी, प्रत्यक्ष नुकसान सोसणाऱ्या अनेक कुटुंबांना मदतीपासून वंचित राहावे लागते. कर्जाचा डोंगर वाढत आहे, शेतीचा खर्च वाढत आहे आणि हातात उत्पन्न काहीच नसल्याने अनेक शेतकरी हताश झाले आहेत.
यापेक्षाही मोठी खंत व्यक्त करत शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या बाजूने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रभावीपणे आवाज उठवण्याचा पुरेसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अपेक्षित गांभीर्य मिळाले नाही. आता तरी शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करावा, नियमांमध्ये आवश्यक शिथिलता आणावी आणि प्रत्येक पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी शासनाने केवळ पंचनाम्यांपुरते न थांबता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचवावी, अशी मागणी केली.
योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन
निवेदनाची गांभीर्याने दखल घेत ना. आदिती तटकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित विभागाशी चर्चा करून तातडीने योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
