इंडिया आघाडीकडून मोर्चेबांधणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
मावळ लोकसभा मतदारसंघात 2019 प्रमाणे यावेळी पुन्हा एकदा चुरशीची लढाई होत आहे. मागची निवडणूक जिंकणारे श्रीरंग बारणे यांची यावेळी मात्र कसोटी लागली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने देखील ही निवडणूक अस्तित्वाची केली असून मावळ प्रांतातील दोन तगड्या उमेदवारांच्यात ही मुख्य लढत होणार आहे.
2009 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला आणि या ठिकाणी सलग तीन निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने बाजी मारली आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून सलग तिसर्यांदा शिवसेना पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होत आहे. तब्बल 26 लाख मतदार असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील तीन आणि रायगड जिल्ह्यातील तीन असे सहा मतदारसंघ येतात. त्या सर्व सहा मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. पण राज्यातील राजकीय समीकरणे आणि मतांचे ध्रुविकरण लक्षात घेता मावळमध्ये यावेळी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना जनमानसात मिळत असलेली सहानभुती तसेच इंडिया आघाडीची या मतदारसंघात निर्माण झालेली मोट यामुळे संजोग वाघेरे-पाटील यांनी या लढतीत उत्सुकता निर्माण केली आहे. महाविकास आघाडीकडे मुस्लिम समाजाची मते वळली असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी विद्यमान खासदार बारणेंचे सहकार्य मिळाले नसल्याची भावना मराठा समाजाची आहे. त्यामुळे मराठा समाज या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहील्याचे चित्र आहे. या सर्व बाबिंशिवाय शरद पवार यांची राष्ट्रवादी, तसेच राष्ट्रीय काँग्रेस हे एकदिलाने इंडिया आघाडीसाठी आपली सर्व शक्ती लावून प्रचारात उतरले आहेत. त्यावेळी सर्वात महत्वाची भूमिका या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष बजावताना दिसत आहे. शेकापचे सर्व कार्यकर्ते इंडिया आघाडीसाठी मैदानात उतरले असल्याने पनवेल, खालापूर, उरण आणि कर्जत तालुक्यात संजोग वाघेरे यांच्या मागे ताकद लावून आहेत. तर, दुसरीकडे महायुतीमध्ये सर्व घटकपक्ष एकत्र प्रचार करताना दिसत नाहीत. त्याचा फटका बारणेंना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. मात्र, त्यात उरणमध्ये भाजपचे सहयोगी आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार लढत देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे उरणमध्ये महायुती आघाडी मिळविण्याची शक्यता कमी आहे. कर्जतमध्ये महायुतीच्या घटक पक्षांची ताकद पाहिली तर महाविकास आघाडी पेक्षा किमान 60 हजाराचे मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. परंतु, स्थानिक पातळीवर एवढे मताधिक्य बारणे यांना मिळेलच याचा ठाम दावा कोणीही करताना दिसत नाही.
पनवेल मतदारसंघात भाजपची ताकद प्रंचड आहे. पण, तेथे शेकापने मोठी ताकद उभी केली आहे. ही ताकद संजोग वाघेरे यांच्यामागे उभी असून पनवेल मधील बारणेंचे मताधिक्य घटण्याची शक्यता वाढली आहे. मावळ प्रांतात मावळ, पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही ठिकाणी महायुतीची ताकद प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. मात्र, मावळ मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे पिंपरी चिंचवड भागातील असल्याने आणि त्या दोन्ही उमेदवारांची ताकद लक्षात घेता त्या भागातून आघाडी घेउन येणारा उमेदवार मावळचा खासदार बनणार आहे.
दरम्यान, मावळमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हा मतदारसंघ पुन्हा मिळविला जातो काय? किंवा बारणे हे तिसर्यांदा खासदार होतात काय? हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आणि महविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता काही अनपेक्षित निकाल देखील लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या मतदारसंघात अन्य 31 उमेदवारांकडून निवडणूक लढवली जात आहे. त्या तील बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांकडून किती मते घेतली जातात यावर देखील विद्यमान खासदारांच्या मतांचे गणित अवलंबून राहणार आहे.