| ठाणे | प्रतिनिधी |
तलावांचे शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाले असल्याची भीती व्यक्त होत आहे. या तलावात 24 दिवसांत सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून, महापालिकेचे प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न फोल ठरले आहेत.
महापालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णीबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून, तलावाची निगा राखण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. परंतु, या कंत्राटदारावर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून मेहेरनजर ठेवली जात आहे. त्यामुळे या तलावातील प्रदूषणावर उपाययोजना झाली नाही. परिणामी 24 एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाला. त्यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु, त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे 10 मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला होता. तर, आता पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचे आढळले आहेत.