अलिबागची मासळी मुरूड मार्केटला
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूडच्या समुद्रात पडलेला मासळीचा दुष्काळ अद्याप कायम असून, त्या मुळे मच्चीमारांनी मुरूड आणि एकदरा या खाडीत बहुतांश नौका नांगरल्या आहेत.सध्या मुरूड मार्केट मध्ये अलिबाग येथून मोठी मासळी येत असल्याची माहिती जेष्ठ मच्चीमार अजित भोबु, यांनी बोलताना दिली.मुरूड च्या समुद्रात कोलंबी किंवा छोटी मासळी जेमतेम मिळत असून सर्व सामान्यांना मासळी परवडत नसल्याचे दिसून आले.पर्यटक देखील भाव पाहून थबकत आहेत.ग्रामीण भागातील ग्रामस्थानी मासळी मार्केट कडे पाठच फिरवल्याचे दिसून आले.नौका खाडीत नागरल्या तरी जाळी शिवणे, चोप्रान खलाशी खर्च आदी बाबी पूर्ण करणे मच्चीमार मंडळींना खूपच जड जाताना आहे.नुसती कोलंबी मिळून देखीत डिझेलचा खर्च सुटत नाही.
मुरूड, राजपूरी, दिघी, मुरूड समुद्रात धक्कादायक असा मासळीचा ओला दुष्काळ पडल्याचे कित्येक दिवसापासून दिसत असून मच्चीमार आर्थिक समस्येने कमालीचे त्रस्त दिसून येत आहेत.मुरूड मार्केट मध्ये फक्त कोलंबी मासळी आधिक दिसत असून अलिबाग येथून सुरमई, रावस, पापलेट मासळी येत असून स्थानिक पातळीवर बोइट, बांगडे, कालव आदी मासळी 40 टक्के दिसून येत आहे.20 वर्षा पूर्वी मुरूड च्या समुद्रात मासळीचा सुकाळ होता. सुरमई, पापलेट,कोलंबी, घोळ, जिताडा, अशी मोठी मासळी उदंड मिळत असल्याने भाव आवाक्यात होते. आज याच्या एकदम उलट परिस्थिती आहे.मुरूड ला समुद्र असूनही मासळीचा एवढा तुटवडा का ? असा प्रश्न पर्यटकांना पडतो. समुद्रकिनारपट्टीत एलईडी,पर्सनीन आदी मासेमारी होत असल्याने मासळी मिळते.अशी मासेमारी पद्धत शासनाच्या नियमानुसार बेकायदेशीर आहे.मुरूड परिसरात अशी मासेमारी केली जात नाही.पारंपारिक मासेमारी हा मुरूड च्या मच्चीमारांचा गाभा आहे.बदलत्या परिस्थिती प्रमाणे बदलले पाहिजे हे जरी खरे असले तरी आधुनिक मासेमारी साधने खरेदीसाठी कोणतीही बँक आर्थिक सहकार्य करेल असे संभवत नाही.
खामदे गावच्या खाडीत मिळणारी सफेद कोलंबी पूर्वीप्रमाणे मुबलक मिळत नाही.बोईट सारखी मासळी देखील कमी झालेली दिसून येत आहे.अरबी समुद्रामुळे दिघी- राजपुरी मार्गे खामदे, मांदांड, कुडे, हरवीत, कुडगाव, राहटाड या गावापर्यंत खाडी पट्टा पसरलेला असून येथे स्थानिक मच्चीमारांची पारंपरिक मासेमारी चालते; परंतु समुद्रातील उलथापालथी मुळे खाडी पट्टा देखिल मासळीविना दुष्काळाच्या गडद आहे.मासळीबाबत या भागात आधिक शासकीय स्थरातून संशोधन आणि सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.मुरूड परिसरातील मासेमारी विविध कारणांनी संकटात आहे.त्या मुळे काहींना काही शासकीय स्तरावर संशोधन आवश्यक आहे.कारण मासेमारीतून शासनाला परकीय चलन आणि मोठे उत्पन्न मिळत असते.बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी कडक कारवाईची आवश्यकता आहे.परन्तु येथे कुंपणच शेत खाते असा प्रकार असल्याची काही मच्चीमारांनी व्यक्त केली.