| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या खात्यात साडेचार हजार कोटी रुपये थेट जमा झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या नाकीनऊ आलं आहे. पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. अशातच शेतकर्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागून राहिल्या आहेत. सरकारने त्यासाठी शेतकर्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे.
तसंच कालपर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे केले जातील, तसंच आपल्याकडे पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. दीड महिन्यात सात हजार कोटी शेतकर्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच सरकार शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. ज्यामुळे शेतीत नुकसान झाल्यावर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही. उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाईल. लवकरच अशा प्रकारची सिस्टीम उभारली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री