। मुंबई । वृत्तसंस्था ।
म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील परीक्षेतील गोंधळाचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी उमटले. मागील भाजप सरकारच्या काळात खासगी कंपन्यांना वाट्टेल त्या पद्धतीने भरती प्रक्रियेसाठी नेमल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. भरती प्रक्रिया व महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याने यापुढे राज्य सरकारच्या नोकरभरतीची परीक्षा यापुढील काळात एमकेसीएल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल किंवा टीसीएस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात याव्यात असा निर्णय घेण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटी असो की म्हाडाच्या परीक्षेतील गोंधळ, एकंदरच सरकारी नोकरभरतीमधील प्रक्रिया आणि परीक्षांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरती प्रक्रिया व महाविकास आघाडी सरकारविरोधात त्यातून नाराजी निर्माण होते. सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत आहे, आशी चिंता मंत्र्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भरती प्रक्रियेतील या गोंधळाबाबत मंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेशी सहमती दर्शवली.