। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील अनेक गावातील स्मशानभूमींचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. स्मशानभूमी हा अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण विषय आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी स्मशानभूमीच्या दुरवस्थेने अक्षरश: प्रेत भिजून मरणानंतरही मृतदेहाची विटंबना होत असल्याचे प्रकार वारंवार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी, संपूर्ण तालुक्यातील स्मशानभूमींचा शासकीय सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शासनाकडे केली आहे.
ढोकशेत येथील स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप प्रकाश देसाई यांनी केला आहे. काम अपूर्ण असताना बिल काढले असून, स्मशानभूमीची अवस्था सद्यःस्थितीत अत्यंत दयनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील अनेक ठिकाणी दिसून येत असून, अशा कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
यासंदर्भात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीचा शासकीय सर्व्हे करून कारवाई करण्याची मागणी प्रकाश देसाई यांनी केली आहे.