अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथील हृदयदावक घटना
खून करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
| अलिबाग | प्रतिनिधी |
जेवण न दिल्याचा राग धरून पोटच्या पोराने आईला पेटवून दिल्याची घटना अलिबाग तालुक्यातील नवखार येथे मंगळवारी रात्री घडली. दांडक्यासह कोयत्याने मारहाणदेखील त्याने केली. त्यामध्ये जखमी होऊन उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ती मृत झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याला रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयेश खोत ( 25 ) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. परंतु नोकरी नसल्याने कधी हॉटेलमध्ये तर कधी खेकडा पकडून विकणे असे मिळेल ते काम तो करीत होता. मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास आईने जेवण दिले नाही, म्हणून तो तिला शिवीगाळी करू लागला. त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचला. रागाच्या भरात त्याने तिला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोयत्याने मारत घराबाहेरील अंगणात आणले. आईला मारहाण करीत असल्याचे शेजारांच्या लक्षात आले. ते तिला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याच्या हातात कोयता असल्याने कोणीही त्याच्या जवळ जाण्यास तयार नव्हता. त्याच्या या राक्षसी वृत्तीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाद इतका विकोपाला पोहचला, की त्याने अंगणातील पालापाचोळा तिच्या अंगावर टाकत आईला पेटवून दिले. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्याविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यामुळे जयेश खोत याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव खोत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविला आहे.
यापूर्वीदेखील झाले होते वाद
जयेश खोत हा रागीट वृत्तीचा असल्याने त्याचे नेहमीच आईसोबत वेगवेगळ्या कारणावरून वाद होत असतं. अशी माहिती नामदेव खोत यांनी पोलिसांना दिली.
दोन तासांच्या प्रयत्नाने पकडले
आईला जखमी केल्यावर तो कोयता घेऊन जंगलात पळाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे, श्रीराम पडवळ, पोलीस हवालदार शिंदे, सुर्वे आदींनी त्याचा शोध सुरु केला. तोवर काळोख झाला होता. त्याला पकडणेदेखील महत्वाचे होते. पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता झुडपात, नदी, नाल्याच्या परिसरात त्याला स्थानिकांच्या मदतीने शोधण्यास सुरुवात केली. अखेर एका झुडपात तो लपलेला दिसून आला. पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना तो त्यांना कोयता दाखवत होता. दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पकडण्यास यश आले.
आईला मारल्याचा पश्चाताप
जयेश खोत या तरुणाने किरकोळ कारणावरून आपल्या स्वतःच्या आईला बेदम मारहाण केली. त्यानंतर पेटवून दिले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचे समोर येत आहे. तो या घटनेनंतर कोणाशीही बोलण्यास तयार नसून शांत बसून होता.