सात वर्षानंतरही चिपळूणवासियांची प्रतीक्षा कायम
। चिपळूण । प्रतिनिधी ।
’हायटेक’ धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पहिल्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित बांधकाम कित्येक महिन्यापासून रखडलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे या बसस्थानकानंतर सुरू झालेले रत्नागिरीतील बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाऊन त्याच्या उद्घाटनाचा नारळ फुटणार असताना येथील आगाराच्या स्थितीबाबत नागरिकांतून आगार प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत.
येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्या जागी हायटेक धर्तीवर बसस्थानक बांधण्याच्या कामास काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. मात्र, ठेकेदार व एसटी महामंडळाच्या कुचकामी भूमिकेमुळे या बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ उडाला. यामुळे कित्येक वर्षे होऊनही बसस्थानकाचा पायादेखील पूर्णत्वास गेलेला नव्हता. यामुळे प्रवाशांसह चिपळूणवासियांच्या प्रखर मागणीनंतर जाग आलेल्या एस.टी.महामंडळाने त्यावेळच्या ठेकेदाराचा ठेका काढून त्याजागी बसस्थानकाच्या उर्वरित कामासाठी 2 कोटी मंजूर असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, त्याच्या कामाचे आदेश कधीच दिले आहेत. विशेष म्हणजे सात वर्षापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकाच्या बांधकामाला प्रारंभ झाला. त्यानंतर रत्नागिरी बसस्थानकाला प्रारंभ झाला. तरीही रत्नागिरी बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन चिपळूण बसस्थानकाचे काम अद्यापही रखडल्याने येथील कारभारावर शंका उपस्थित होत आहे. आता दोन आठवड्यानंतर पुन्हा पावसाळी हंगाम सुरू होणार असून या कालावधीत रखडलेल्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागणार की जैसे थे राहणार असा सवाल उपस्थित होत आहे.