श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

​प्रशासनाचे दुर्लक्ष:चालक-मालकांचा मनमानी कारभार!

​। श्रीवर्धन । संदेश घोलप ।

कोकणातील निसर्गरम्य श्रीवर्धन-म्हसळा हा रस्ता आता अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. ओव्हरलोड बॉक्साईडची अवैध आणि बेफाम वाहतूक सर्वसामान्यांच्या जीवावर उठली असून, रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास म्हसळा-सकलप दरम्यान असलेल्या धोकादायक उतारावर बॉक्साईडने गच्च भरलेल्या एका अवजड ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक इतक्या वेगात होता की तो थेट रस्त्याच्या कडेला जाऊन आदळला. या भीषण अपघातात ट्रकचा क्लिनर माझा अझर करमटणी (26), रा. श्रीवर्धन हा जागीच गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून, डोक्यालाही गंभीर जखम झाली आहे. त्याला तात्काळ म्हसळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आले आहे.

​'नशा' आणि 'अंधाराचा' जीवघेणा खेळ
​या मार्गावर केवळ अपघातच होत नाहीत, तर त्यामागे धक्कादायक कारणे समोर येत आहेत.
​रात्रीची दहशत
दिवसा पोलिसांची थोडी भीती असते, पण रात्र होताच हे 'बॉक्साईड माफिया' बेफाम होतात. प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्याने रात्रीच्या अंधारात ट्रक सुसाट धावतात.
नशाखोरीचा संशय
अनेक चालक अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालवत असल्याच्या चर्चांनी परिसरात जोर धरला आहे. चालकांच्या डोळ्यांत दिसणारी नशा आणि त्यांची बेदरकार ड्रायव्हिंग यामुळे नागरिक भयभीत आहेत.
​अपघातांची मालिका
याच मार्गावर आतापर्यंत किमान 7 ते 8 गाड्यांचे अपघात झाले आहेत. हा रस्ता आता 'अपघातप्रवण' क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
​प्रशासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत?
​एकूणच या प्रकारामुळे आरटीओ (RTO) आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ओव्हरलोडिंगवर कारवाई का होत नाही? रात्रीच्या वेळी गस्त का घातली जात नाही? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
​नागरिकांच्या आक्रमक मागण्या
​1. रात्र गस्त वाढवा: रात्रीच्या वेळी या मार्गावर विशेष पोलीस पथक तैनात करण्यात यावे.
2. ब्रेथ ॲनालायझर टेस्ट: प्रत्येक बॉक्साईड वाहून नेणाऱ्या चालकाची वैद्यकीय आणि नशा चाचणी सक्तीची करावी.
3. ओव्हरलोडिंगवर बंदी: क्षमतेपेक्षा जास्त भार वाहणाऱ्या गाड्यांचे परवाने रद्द करावेत.

जर वेळीच या बेकायदेशीर वाहतुकीला पायबंद घातला नाही, तर एखादी मोठी बस किंवा प्रवासी वाहन या अपघाताचा बळी ठरू शकते. प्रशासन आता तरी जागे होऊन कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“प्रशासनाने या अपघातांचा सखोल अभ्यास करावा. ओव्हरलोड वाहतूक आणि बेफाम वेगाला लगाम घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

स्थानिक नागरिक
Exit mobile version