। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत मागील चार वर्षांच्या काळात विद्यार्थी संख्या घटली असून विद्यापीठ प्रशासनाने याबाबतच्या विविध विकासकामांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केला आहे. 90 हजारांच्या दरम्यान विद्यार्थी येथे शिक्षण घेत होते. ती संख्या चार वर्षांत 60 हजारांच्या आसपास आल्याचे या वेळी सांगण्यात आले. यावर विद्यापीठाकडून आयडॉलसाठी असलेल्या अडचणी मान्य करत यावर लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. आयडॉलमध्ये देशभरातील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आदीचे शिक्षण घेतात. येथे पदवी घेतलेले शेकडो विद्यार्थी आज परदेशात जाऊन नोकरी आणि शिक्षणही घेत आहेत. मात्र मागील चार वर्षांत आयडॉलच्या उपकेंद्राचा विषयही अर्धवट ठेवण्यात आला. शिवाय परीक्षा केंद्र वाढवण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष झाले तर प्राध्यापक भरतीही रखडून ठेवण्यात आली. यामुळे आयडॉलकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.